mazionjal

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत… ❤️

 

काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत… ❤️

काही आठवणी ह्या काळाच्या प्रभावाच्या अगदी पलीकडे असतात. त्यांना तारीख, वेळ, वय असं काहीच नसतं. त्या मनाच्या एका कोपऱ्यात अगदी जपून ठेवलेल्या असतात.

एखादा सुवास, एखादं गाणं, एखादा जुना फोटोसुद्धा क्षणात आपल्याला त्या काळात घेऊन जातो.

तेच घर…

तेच अंगण…

तीच माणसं…

आणि आपण… पुन्हा एकदा लहान झालेले.

काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत.

लहानपण तर किती साधं होतं…

ना मोबाईल, ना सोशल मीडिया… प्रत्येक क्षण फोटोमध्ये जतन करण्याची धडपडही नव्हती.

पण तरीही त्या काळात जगलेला प्रत्येक क्षण मनात कुठेतरी कायमचा साठून राहिला.

आज मागे वळून पाहताना जाणवतं, त्या काळात आपल्याकडे फारसं काही नव्हतं; पण तरीही आपण खूप श्रीमंत होतो—आठवणींनी.

आजीचं घर…

आजीच्या घराची आठवण म्हणजे फक्त एक घर नाही.

तो एक अनुभव आहे.

आजीने बनवलेली सांडग्याची भाजी, रात्री केलेली तांदूळ-तूरडाळ खिचडी… आहाहा! अप्रतिम!

आजही आठवलं की तो खमंग सुवास आणि ती चव जिभेवर रेंगाळते.

काहीही खूप मसाले न टाकता ती इतकी सुंदर खिचडी कशी करायची?

कदाचित…

ती तिच्या हातालाच चव होती.

आजीच्या साडीचा तो सुवास आजही आठवतो.

मी तर तिच्या साडीचा ड्रेसच शिवून घेतला होता.

आज त्या साडीचा विचार केला तरी मन पुन्हा त्या दिवसांमध्ये जाऊन पोहोचतं.

आजी आम्हाला गाणी, कविता पण म्हणून दाखवायची.

तिच्या आवाजात कविता ऐकण्याची मजाच काही वेगळी होती.

झोपताना ती मायेने थोपटत म्हणायची—

“रवि गेला रे, सोडुनि आकाशाला
धन जैसें दुर्भाग्याला…
निज नीज माझ्या बाळा…”

त्या शब्दांमध्ये किती माया होती!

आज कितीही वर्षं झाली तरी त्या आवाजाची आठवण मनात तशीच जिवंत आहे.

कधी कधी वाटतं…

आपण मोठे झालो, पण आजीच्या त्या थोपटण्याची गरज मनाला अजूनही आहे.

“किती छान दिवस होते ते…”

आयुष्यात काही माणसं येतात.

काही काळ आपल्यासोबत राहतात.

आपल्यासोबत हसतात, बोलतात, भांडतात, रडतात…

आणि मग एक दिवस त्यांचे रस्ते वेगळे होतात.

काही नाती काळाच्या ओघात दूर जातात.

कधी परिस्थितीमुळे, कधी अंतरामुळे, तर कधी आयुष्याच्या वेगामुळे.

पण काही माणसं दूर गेली तरी त्यांच्या आठवणी मात्र मनातून कधीच दूर जात नाहीत.

आणि मग एखाद्या क्षणी मनात एकच विचार येतो—

“किती छान दिवस होते ते…”

तो जुना फोटो…

मला आठवतं, आम्ही सगळ्या भावंडांनी मिळून एक ग्रुप फोटो काढला होता.

एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून, उंचीप्रमाणे आम्ही सगळे उभे होतो.

तेव्हा तो फक्त एक फोटो होता.

आज तो फोटो हातात घेतला की आपण फक्त चेहरे पाहत नाही…

आपण तो काळ पाहतो.

त्या वेळची माणसं पाहतो.

त्या वेळचं आपलं आयुष्य पाहतो.

आणि कधी कधी त्या फोटोमध्ये आपल्याला आपलंच एक हरवलेलं रूप दिसतं.

तेव्हा जाणवतं—

फोटो जुना झाला असला, तरी त्यातली आठवण अजूनही ताजी आहे.

काळ पुढे जातो…

आपण मोठे होतो.

नोकरी लागते.

लग्न होतं.

मुलं होतात.

जबाबदाऱ्या वाढतात.

आपण सतत पुढे जात राहतो.

पण मनाचा एक छोटासा भाग मात्र त्या जुन्या दिवसांमध्येच राहतो.

कधी एखादं गाणं ऐकलं की…

कधी एखादा सुवास आला की…

कधी एखादा जुना फोटो दिसला की…

तो छोटासा भाग पुन्हा जागा होतो.

आणि आपण काही क्षणांसाठी पुन्हा लहान होतो.

वर्तमान जगायला विसरू नका…

आपण भविष्याची काळजी करताना वर्तमान जगायला विसरतो.

आणि वर्तमान जगताना त्याची आठवण तयार होत आहे, हेही लक्षात येत नाही.

म्हणूनच कधी कधी थांबायला हवं.

आजी-आजोबांच्या आठवणी लिहून ठेवायला हव्यात.

मुलांसोबत मनापासून खेळायला हवं.

मित्रांसोबत मनापासून हसायला हवं.

कारण आजचा हा क्षण…

उद्या कोणाच्यातरी आठवणींचा भाग असणार आहे.

आठवणी म्हणजे आयुष्याची छोटीशी ठेव…

आठवणी म्हणजे आपल्या आयुष्याची छोटी छोटी ठेव असते.

काही आठवणी आनंद देतात.

काही डोळ्यात पाणी आणतात.

काही आपल्याला हसवतात.

तर काही आपल्याला पुन्हा एकदा त्या माणसांजवळ घेऊन जातात, जे आता कदाचित आपल्या जवळ नसतील.

पण म्हणूनच त्या आठवणी मौल्यवान असतात.

कारण माणसं दूर जाऊ शकतात…

जागा बदलू शकतात…

काळ पुढे जाऊ शकतो…

पण मनापासून जगलेले क्षण कधीच संपत नाहीत.

ते आपल्या मनाच्या एका छोट्याशा कोपऱ्यात कायम जिवंत राहतात.

म्हणूनच…

काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. ❤️


तुमचीही अशी एखादी आठवण आहे का?

जी कितीही वर्षं झाली तरी आठवली की तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं?

एखादी व्यक्ती, एखादं घर, एखादा सुवास, एखादं गाणं किंवा एखादा जुना फोटो…

तुमची अशी आठवण Mazi Onjal सोबत नक्की शेअर करा. ❤️

शुक्रवार, २६ जून, २०२६

संध्याकाळ थांबली तेव्हा...

 


काही संध्याकाळी फक्त मावळत नाहीत... त्या मनात रेंगाळत राहतात.

खूप दिवसांनी आज संध्याकाळ

माझ्या खिडकीशी निवांत थांबली

आणि नकळत तुझ्या नावाचा सुगंध घेऊन आली '

 

खूप बोललो आम्ही एकमेकांशी

शब्द नाही 

पण भावनांच्या कल्लोळाशी

 

जेवढ्या मावळतीच्या छटा

तिने आभाळभर पसरवल्या,

तेवढ्याच तुझ्या आठवणी

मनात गडद होत गेल्या...

 

उर दाटून आला होता

डोळे थोडे पाणावले

माझ्या काळजीने संध्येने परत जाणे हि नाकारले

 

मी म्हटलं तिला - जा बाई त्या सूर्य मागे ,एकटा सोडू नको त्याला ,

घरी परतत असताना, सोबत तुझीच तर असते त्याला...

 

ती फक्त मंद हसली...

 

आणि निघून जाताना

माझ्या ओंजळीत

तुझ्या आठवणींचा

एक संधिप्रकाश ठेवून गेली.

गौरी


शनिवार, २० जून, २०२६

🌧️ पावसाच्या रंगात चिंब

 



🌧️ पावसाच्या रंगात चिंब

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ...
मातीचा मंद धुंद सुगंध...
आणि मनाला भिजवून टाकणारा पाऊस...

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ, पावसाचा निरोप घेऊन येणारा गार वारा, दुपारीही संध्याकाळ झाल्याचा भास आणि मातीचा मंद धुंद सुगंध... एक-एक थेंब पडायला सुरुवात होते. मग रिमझिम सर येते आणि क्षणार्धात ताशासारखा कोसळणारा पाऊस सुरू होतो.

या सगळ्या वातावरणाबरोबर मनही चिंब भिजून जातं. उन्हाळ्याच्या अस्तित्वाची एकही खूण मागे न ठेवता तो आपल्या आगमनाने सगळा शीण विसरवून टाकतो. फुलांपासून माणसांपर्यंत, पशुपक्ष्यांपासून सृष्टीतील प्रत्येक जीवाला तो आपल्या रंगात रंगवून टाकतो, भिजवून टाकतो.

नव्या उमेदीची, नव्या ऊर्जेची आणि आनंदाची चाहूल घेऊन येणारा हा पाऊस केवळ ऋतू नसतो, तर तो एक अनुभव असतो. प्रत्येक सरीसोबत मनाला नव्याने जगण्याची प्रेरणा देणारा, आठवणींना ओलावा देणारा आणि निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जोडणारा हा पाऊस मला खूप आवडतो.

“पाऊस फक्त धरतीला भिजवत नाही, तो मनालाही नव्या उमेदीने चिंब करून जातो.” ☔🌿

#पावसाच्यारंगातचिंब #मराठीब्लॉग #पाऊस #निसर्ग #मनोगत 

सोमवार, १८ मे, २०२६

स्पंदन...Vibration..Aura cleaning

 

स्पंदन...Vibration..Aura cleaning  


काही जागा नकाशावर नसतात
त्या मनाच्या आत दडलेल्या असतात.

 

काही ठिकाणं फक्त पाहिली जात नाहीत
ती आपल्या आत कुठेतरी कायमची जागी होतात.

 

आपण तिथे फक्त जात नाही,
तर नकळत स्वतःलाच भेटून येतो.

 

त्या रस्त्यांना काही जादू असते का…?
की आपल्या आतच काही हरवलेलं असतं,
जे तिथे गेल्यावर शांतपणे सापडतं
हे कधीच कळत नाही.

 

तिथला वारा वेगळा नसतो,
आकाशही नेहमीसारखंच असतं
पण त्या जागेत पाऊल टाकताच
मनावर चढलेली एक अदृश्य धूळ
हलकेच झटकली जाते.

 

मग आपण क्षण क्षण जगू लागतो
जणू वेळ थोडावेळ मंदावली आहे.

आणि त्या सुंदर क्षणांच्या गर्दीतही
मनाच्या एका कोपऱ्यात
एक शांत जाणीव उभी असते

परत जायचं आहे
पुन्हा त्याच घरात,
त्याच कामात,
त्याच आयुष्यात.”

 

पण कदाचित
हाच त्या प्रवासाचा सर्वात गूढ भाग असतो.

कारण परतताना
जागा बदललेली नसते
बदललेलं असतं आपलं स्पंदन.

 

काहीतरी मागे
तिथेच राहिलेलं असतं
आणि काहीतरी नवीन
आपल्या आत जन्माला आलेलं असतं.

 

म्हणूनच काही प्रवास कधीच संपत नाहीत.

आपण घरी परततो
पण मन अजूनही
त्या जागेच्या शांत प्रतिध्वनीत
हळूच रुंजी घालत राहतं

 

प्रवास संपतो
पण त्या जागेची स्पंदनं
मनात बराच काळ फिरत राहतात.”

 

Gauri Ekbote

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

ओढ अनामिक

 




शब्द हरवले, डोळे बोलत राहिले गं

सांगितलेलं तुझ्यापर्यंत पोहोचविलं. ।।

आर्तता ही मनाची,मनालाच कळाली गं,

ओढ अनामिक एकमेका लागली गं ।।

 

गौरी


शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

✨ जिवाशिवांची जडलेली समाधी ✨



जिवाशिवाची जडली समाधी,
अंतरीची सारी व्याकूळता निवळली.
पडलेले सारे कल्लोळही थांबले,
ना काळ राहिला, ना दिशा ह्या दाही.

श्वासांची ही हरवली ती लय,
देहाच्या आठवणीही गेल्या विझून.
स्वतःचेही न उरले भान—
शून्यातून उमटला एक तो  सूर — श्रीकृष्ण,  श्रीकृष्ण…

विटला प्रपंच, तुटली उपाधी,
मनाची सारी चंचलता थांबली.
निरभ्र शांततेत उमलला एक लय—
मन जाहले आता हरिमय, हरिमय.

गौरी 

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

अबोल शब्दांचा कल्लोळ

**माझी ओंजळ….**  

_— अबोल शब्दांचा कल्लोळ_  


दाटून आलेल्या मनात,  

भावनांचा कल्लोळ…  


ओठांनी मात्र निवडला मार्ग तो — अबोल,  

शब्द जणू विसरले ओठांच्या वाटा.  


मनातल्या गोष्टी, मनातच रुतल्या आता,  

नजरेत कधी असतात कथा अंतरीच्या.  


तर कधी आसवे सांगतात — वेदना जिव्हाळ्याच्या.  

कागदावर उतरू पाहतात कितीतरी विराणी,  


पण गोठते लेखणी अन हरवते  

शब्दांची शिदोरी…  


गौरी