mazionjal

शनिवार, २० जून, २०२६

🌧️ पावसाच्या रंगात चिंब

 



🌧️ पावसाच्या रंगात चिंब

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ...
मातीचा मंद धुंद सुगंध...
आणि मनाला भिजवून टाकणारा पाऊस...

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ, पावसाचा निरोप घेऊन येणारा गार वारा, दुपारीही संध्याकाळ झाल्याचा भास आणि मातीचा मंद धुंद सुगंध... एक-एक थेंब पडायला सुरुवात होते. मग रिमझिम सर येते आणि क्षणार्धात ताशासारखा कोसळणारा पाऊस सुरू होतो.

या सगळ्या वातावरणाबरोबर मनही चिंब भिजून जातं. उन्हाळ्याच्या अस्तित्वाची एकही खूण मागे न ठेवता तो आपल्या आगमनाने सगळा शीण विसरवून टाकतो. फुलांपासून माणसांपर्यंत, पशुपक्ष्यांपासून सृष्टीतील प्रत्येक जीवाला तो आपल्या रंगात रंगवून टाकतो, भिजवून टाकतो.

नव्या उमेदीची, नव्या ऊर्जेची आणि आनंदाची चाहूल घेऊन येणारा हा पाऊस केवळ ऋतू नसतो, तर तो एक अनुभव असतो. प्रत्येक सरीसोबत मनाला नव्याने जगण्याची प्रेरणा देणारा, आठवणींना ओलावा देणारा आणि निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जोडणारा हा पाऊस मला खूप आवडतो.

“पाऊस फक्त धरतीला भिजवत नाही, तो मनालाही नव्या उमेदीने चिंब करून जातो.” ☔🌿

#पावसाच्यारंगातचिंब #मराठीब्लॉग #पाऊस #निसर्ग #मनोगत 

सोमवार, १८ मे, २०२६

स्पंदन...Vibration..Aura cleaning

 

स्पंदन...Vibration..Aura cleaning  


काही जागा नकाशावर नसतात
त्या मनाच्या आत दडलेल्या असतात.

 

काही ठिकाणं फक्त पाहिली जात नाहीत
ती आपल्या आत कुठेतरी कायमची जागी होतात.

 

आपण तिथे फक्त जात नाही,
तर नकळत स्वतःलाच भेटून येतो.

 

त्या रस्त्यांना काही जादू असते का…?
की आपल्या आतच काही हरवलेलं असतं,
जे तिथे गेल्यावर शांतपणे सापडतं
हे कधीच कळत नाही.

 

तिथला वारा वेगळा नसतो,
आकाशही नेहमीसारखंच असतं
पण त्या जागेत पाऊल टाकताच
मनावर चढलेली एक अदृश्य धूळ
हलकेच झटकली जाते.

 

मग आपण क्षण क्षण जगू लागतो
जणू वेळ थोडावेळ मंदावली आहे.

आणि त्या सुंदर क्षणांच्या गर्दीतही
मनाच्या एका कोपऱ्यात
एक शांत जाणीव उभी असते

परत जायचं आहे
पुन्हा त्याच घरात,
त्याच कामात,
त्याच आयुष्यात.”

 

पण कदाचित
हाच त्या प्रवासाचा सर्वात गूढ भाग असतो.

कारण परतताना
जागा बदललेली नसते
बदललेलं असतं आपलं स्पंदन.

 

काहीतरी मागे
तिथेच राहिलेलं असतं
आणि काहीतरी नवीन
आपल्या आत जन्माला आलेलं असतं.

 

म्हणूनच काही प्रवास कधीच संपत नाहीत.

आपण घरी परततो
पण मन अजूनही
त्या जागेच्या शांत प्रतिध्वनीत
हळूच रुंजी घालत राहतं

 

प्रवास संपतो
पण त्या जागेची स्पंदनं
मनात बराच काळ फिरत राहतात.”

 

Gauri Ekbote

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

ओढ अनामिक

 




शब्द हरवले, डोळे बोलत राहिले गं

सांगितलेलं तुझ्यापर्यंत पोहोचविलं. ।।

आर्तता ही मनाची,मनालाच कळाली गं,

ओढ अनामिक एकमेका लागली गं ।।

 

गौरी