mazionjal

शुक्रवार, २६ जून, २०२६

संध्याकाळ थांबली तेव्हा...

 


काही संध्याकाळी फक्त मावळत नाहीत... त्या मनात रेंगाळत राहतात.

खूप दिवसांनी आज संध्याकाळ

माझ्या खिडकीशी निवांत थांबली

आणि नकळत तुझ्या नावाचा सुगंध घेऊन आली '

 

खूप बोललो आम्ही एकमेकांशी

शब्द नाही 

पण भावनांच्या कल्लोळाशी

 

जेवढ्या मावळतीच्या छटा

तिने आभाळभर पसरवल्या,

तेवढ्याच तुझ्या आठवणी

मनात गडद होत गेल्या...

 

उर दाटून आला होता

डोळे थोडे पाणावले

माझ्या काळजीने संध्येने परत जाणे हि नाकारले

 

मी म्हटलं तिला - जा बाई त्या सूर्य मागे ,एकटा सोडू नको त्याला ,

घरी परतत असताना, सोबत तुझीच तर असते त्याला...

 

ती फक्त मंद हसली...

 

आणि निघून जाताना

माझ्या ओंजळीत

तुझ्या आठवणींचा

एक संधिप्रकाश ठेवून गेली.

गौरी


शनिवार, २० जून, २०२६

🌧️ पावसाच्या रंगात चिंब

 



🌧️ पावसाच्या रंगात चिंब

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ...
मातीचा मंद धुंद सुगंध...
आणि मनाला भिजवून टाकणारा पाऊस...

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ, पावसाचा निरोप घेऊन येणारा गार वारा, दुपारीही संध्याकाळ झाल्याचा भास आणि मातीचा मंद धुंद सुगंध... एक-एक थेंब पडायला सुरुवात होते. मग रिमझिम सर येते आणि क्षणार्धात ताशासारखा कोसळणारा पाऊस सुरू होतो.

या सगळ्या वातावरणाबरोबर मनही चिंब भिजून जातं. उन्हाळ्याच्या अस्तित्वाची एकही खूण मागे न ठेवता तो आपल्या आगमनाने सगळा शीण विसरवून टाकतो. फुलांपासून माणसांपर्यंत, पशुपक्ष्यांपासून सृष्टीतील प्रत्येक जीवाला तो आपल्या रंगात रंगवून टाकतो, भिजवून टाकतो.

नव्या उमेदीची, नव्या ऊर्जेची आणि आनंदाची चाहूल घेऊन येणारा हा पाऊस केवळ ऋतू नसतो, तर तो एक अनुभव असतो. प्रत्येक सरीसोबत मनाला नव्याने जगण्याची प्रेरणा देणारा, आठवणींना ओलावा देणारा आणि निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जोडणारा हा पाऊस मला खूप आवडतो.

“पाऊस फक्त धरतीला भिजवत नाही, तो मनालाही नव्या उमेदीने चिंब करून जातो.” ☔🌿

#पावसाच्यारंगातचिंब #मराठीब्लॉग #पाऊस #निसर्ग #मनोगत