mazionjal

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

भेट ना रे एकदा.......

 


माझ्या गावा मधलं कोणी मथुरेला येणार हे कळलं ना तरी मनात हुरहूर सुरु होते , भावना इतक्या अनावर होतात कि डोळे पाण्याने भरून येतात , मन जड होऊन जात, उर भरून येतो ,  काय करू काय नको काही सुचत नाही , तुझ्या साठी काय बनवू , काय पाठवू तुझ्या साठी , काय काय देऊन काय नाही काही उमगतच नाही . सतत तुझा चेहरा डोळ्यापुढे येत असतो तस हे असं होणं रोजच बर का ... पण इथून तुझ्या कडे कोणी निघालय ह्या बातमी नेच काय होत काही कळत नाही बघ .

 मन… ते तर केव्हाच त्या येणाऱ्या व्यक्तीच्या मागे पुढे करत असत , त्या च्या बरोबर मनाने मी कधीच तुझ्या पर्यंत पोहोचलेली पण असते

तू काय करत असशील , काय बोलत असशील , तू कोणता पेहराव केला असशील , माझी चौकशी करशील का त्या व्यक्ती कडे

तुला भेट म्हणून दिलेली बासुरी त्या व्यक्तीने तुला दिल्यावर तुझी काय प्रतिक्रिया असेल

हे सगळं सगळं जाणून घ्यायचय , मला मी तिथे नसताना सुद्धा हे अनुभवायचं , मला तुझ्याकडे यायचं . आई पासून खूप दिवस एखाद मुलं लांब असलं आणि अचानक आई समोर आली कि जे वाटत ना , जी सैरभैर भावना असते ना , तिच्या गळ्यात पडून ती नसताना तिची किती आठवण आली , हे सांगायचं तस अगदी तसच अनुभव करते आहे

भेट ना रे एकदा.......


रविवार, १ सप्टेंबर, २०२४

भांडण

     

नाही बोलायचं तुझ्याशी मला , जाऊ दे ना ,सोड आता

खूप चीड चीड होते आहे माझी ,वैतागले आहे मी तूर्तता

 

मला नाही बोलायचं आज कोणाशी , का मी बोलू ?

परत तोच विषय निघणार ,परत आपलं भांडण होणार

परत तीच चीड चीड , राग, रुसवा आणि  फुगवा ..... 

हि प्रोसेस च  नको मला आता

नाही बोलायचं तुझ्याशी मला , जाऊ दे ना ,सोड आता

 

 

त्या पेक्षा थांबू यात का काही दिवस आपण ?

परत विचार करू यात दोघंहि जण

का भांडलो होतो ?,तो विषय खरंच गरजेचा आहे का  ?

तस वागणं गरजेचं आहे का ?, आपलं नातं ह्यामुळे बिघडतंय का ?

काय महत्वाचं आहे तो विषय कि नातं ?

थांबूयात थोडा वेळ  , देऊ यात  ह्या वेळेला हि वेळ

सोडवायला हा गुंता

नाही बोलायचं तुझ्याशी मला , जाऊ दे ना ,सोड आता

 

मग ह्यातून काय मार्ग आहे ?  कि जेणे करून ह्या चक्रातून पडू  बाहेर

ह्याला पळपुटे पण तर नाही ना म्हणणार ?

खूप ओव्हरीथींक होतंय का ?

 

Gauri Ekbote

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

आठवणींची पोटली

 


सांज वेळी आठव तुझी, अथांग समुद्र भासे 
आठवणींच्या लाटांनाही उगाच उधाण येतसे 
नसतो दिवस नसते रात्र, हि संधिप्रकाशाची वेळ 
कातरवेळी हूर हूर मनी, भास तुझे हे खेळी खेळ 

तो पहा, तो सूर्य हि  जातसे 
चांदणीस भेटावया 
सोडूनि सर्व किरणांचा  पसारा 
 होऊनि चंद्र, चांदणं बरसावया 

एकटाच मी ह्या किनाऱ्यावर तू पल्याड पोहोचली 
सोबतीस आहे आता तुझ्या आठवणींची पोटली


शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

कट्टर चहाप्रेमी

 


प्रिय चहा 

तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस हे तुला मी शब्दात नाही सांगू शकत , रात्री झोपेतून उठवून सुद्धा कोणी विचारल ना कि "चहा घेणार का ?" मी झोपेत "हो " म्हणेल . तुला नाही म्हणणे म्हणजे मोठ्ठं पाप आहे माझ्यासाठी.

तुझ्या संगती मुळेच MBA चा फायनल चा अभ्यास रात्रभर जागून करू शकले 

तुझ्या साथीमुळेच आज किती हि टफ situation आली तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो , एक कडक चहा आणि अहाहा ... डोक्यातले सगळे lights  ON . 

घरातले सगळे काम संडे ला संपवले कि तुझ्या सोबतचे  ते फक्त १० मिनिट आणि mind , body  एकदम उत्साही . 

तू ना .... तू एक अविभाज्य घटक आहेस माझ्या  आयुष्यातला. तू नाही तर माझ्यातला उत्साह नाही बघ .. दिवसातून तुला ४वेळा भेटलं ना कि बास्स्सस ,,, सगळा कंटाळा गायब .   


आणि मला पण माहित आहे कि तू सुद्धा माझ्या शिवाय नाही राहू शकत , कालचच बघ ना , दहीहंडी चा कार्यक्रम बघायला गेलेलो आणि येताना सगळे बोलले कि मस्त पाऊस पडतोय सो सगळे मस्त कॉफी घेऊ गरम गरम ,,,, म्हणून कॉफी ची ऑर्डर दिली पण त्या माणसावर काय जादू झाली काय माहित त्याने सगळ्यांना अगदी pure दुधाचा कडक चहा दिला .... तो एकटाच इतका भारी होता कि कुणी त्या ऑर्डर घेणाऱ्याला त्याची चूक दाखवलीच नाही .... मस्त तिथे चहा सोबत शेजारची दहीहंडी एन्जॉय केली आणि घरी आलो.

पण तुला सांगू का तुझे ते सारखे मूड स्विंग होता ना ते काही मला नाही आवडत बर का ... यार काय हे ... कधी तू ग्रीनटी होतो , कधी ब्लॅक टी ,

 कधी गुळाचा , तर कधी अमृततुल्य ,तर कधी तंदुरी, कधी मसाला चहा.... हे तुझे  स्विंग काही मला नाही आवडत बघ   .... तू मला फक्त आणि फक्त घट्ट वाफाळलेला च आवडतो , घरच्या कपबशीत  हां .... म्हणजे कधी कधी तुला मी आल्याबरोबर किंवा त्या गवता  बरोबर पण accept करते. सो you are my favorite मधला. आणि मी एक चहाप्रेमी .(फक्त तुझे ते mood स्विंग सोडून , ते काही मला नाही चालणार )


तुझीच कट्टर चहाप्रेमी

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

आकाश

 


दूर डोंगर क्षितिजाशी बसून निळाईला न्याहाळत हरवून जायला होत

हे आकाश मोठं चमत्कारिक हं , आणि तेवढंच fashionable.

म्हणजे बघ ना - सकाळ होताच गुलाबी रंगाची उधळण त्यात हि खूप वेग वेगळया सुंदर  छटा

उगवतीला बघितलं तर लाल रंग आणि त्या नंतर इतरत्र फिकट गुलाबी त्या हि पुढे निळा आणि काळा असा मिश्रित रंग कि ज्याला  थोडी गुलाबी किनार आणि त्यात पहाटेचा शांत गार वारा अहाहा .....

जसा जसा सूर्य वर येईल तस तस ती लाली आजून वाढत जाणार आणि दुपार पर्यंत पिवळ्या रंगाचे कपडे घालून केव्हा तयार होऊन येईल कोणाला कळणार देखील नाही

किती तरी रंग , रंगाच्या छटा हे आकाश पांघरून असत

कधी निळा , कधी लाल,तर कधी गुलाबी   

कधी काळा , कधी पिवळा तर कधी केशरी

रात्रीच्या आकाशाची तर सजण्याची मजा काही न्यारी

नुसतं काळया रंगाचे कपडे घालून नाही तयार होणार  तर त्या गडद काळ्या कपड्यावर चांदण्याच जरी वर्क

आणि चंद्राचं कोंदण करून घेणार, रातराणीच्या अत्तराचा छोटासा फाय जवळ ठेवणार

आणि शांत स्तब्ध तलावात एक सारखं स्वःताच रूप न्याहळत बसणार ,

संध्याकाळी बगळ्यांच्या रांगेत गप्पा गोष्टी करणार    

तर घारी  बरोबर उंच उंच जाण्याची शर्यत जमवणार

 एखादा भरकटलेला ढग आलाच मध्ये तर हवे च्या बरोबर त्याला त्याच्या घरी सोडणार

नदी बरोबर उद्या मारत अवखळत समुद्राला जाऊन भेटणार

डोंगराच्या पलीकडे जाणाऱ्या सूर्याला चिमण्या पाखरांन बरोबर बाय बाय करणार आणि त्याला स्वतःत सामावून घेणार आणि परत म्हणणार "उद्या भेटू रे ... "

गौरी एकबोटे

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

कृष्णा लीला : कुवलयापीड चा वध

 

समस्त शस्त्र विद्येत पारंगत , एक लाख हत्तीचं बळ असलेला , प्रचंड , विशालकाय , बलवान असा  बळी राजाचा मुलगा मंदगती , हा अतिशय उन्मत्त ,राजकुमार होता पण तो रंगनाथ चा निस्सीम भक्त होता . 

रंगनाथ च्या यात्रे साठी लोक खूप लांबून पायी चालत येत, हातात झेंडे , पताका मृदंग वाजवत ते यात्री त्या यात्रेस जात , त्यात अनेक प्रकारचे लोक असत , बायका, माणसं , मुलं , साधू , संन्यासी , त्या परम ईश्वराचे नाव घेत भजन कीर्तन करत ते आपला मार्ग क्रमण करत

 एकदा मंदगती  रंगनाथ च्या यात्रा  साठी पायी जायला निघाला , तो ह्या गर्दीत घुसून झपाझप  आपल्या विशाल बहू मागे पुढे हलवत , हत्तीची चाल चालत ढांगा टाकत चालू लागला  , त्याच्या त्या विशाल बाहुंचा धक्का लागून अनेक माणसं , बायका मुलं खाली पडत होते काही त्याच्या पायाखाली चिरडले जात होते

आणि अश्यातच त्याचा धक्का मुनिवर्य त्रित ह्यांना लागला आणि ते खाली पडले. आजूबाजूची जखमी मानस बघून , मंदगतीचा उन्मत्तपणा बघून मुनी त्रित ह्यांना प्रचंड राग आला त्यांनी त्याच क्षणी मंदगतीला शाप दिला " तू हत्ती सारखा उन्मत्त होऊन वाटेतील सगळ्यांना चिरडत पुढे जात आहेस , तू आत्ता  ह्या क्षणा पासून एका हत्तीचं जीवन हत्ती होऊन जगशील " आणि मंदगतीला ह्या शापाचा परिणाम लगेचच दिसू लागला , मुनींच्या त्या तेजाला त्याने ओळखलं आणि हात जोडून त्यांची माफी मागितली आणि तुम्ही कृपासिंधु आहांत , श्रेष्ठ योगीन्द्र आहेत , मला माझी चूक कळली आहे ,  मला माफ करावं , तुमच्या सारख्या महात्म्यांचे मी ह्या पुढे अवहेलना न करता आदराचं करेल , अशी चूक परत नाही करणार , तुमच्या सारखे योगीच एखाद्याला शाप आणि उपशाप देण्यासाठी समर्थ असतात , मला उपशाप द्यावा हि विनंती तो करू लागला. त्याच्या विनवणिला , आर्जवाला मुनींनी होकार दिला आणि त्याला उपशाप दिला तो असा कि - माझी वाणी कधी हि खोटी नाही होणार , मी तुझ्या श्रीरंगाच्या भक्ती ला जाणतो , आणि म्हणूनच मी तुला असा दिव्य वर देणार आहे कि जो कोणत्याची देवाला ह्या आधी मिळालेला नाही , हे मंदगती तू शोक करू नको श्रीहरीची नागरी मथुरा मध्ये स्वतः श्रीहरीच्या हाताने तुझा उद्धार होईल तुला मुक्ती मिळेल "

 

त्या नंतर बरेच वर्ष मंदगती हत्ती हा मगध राज्य जवळील अरण्यात भटकत राहिला , मगध देशाचा राजा एकदा आपला संपूर्ण ताफा घेऊन शिकारी साठी जंगलात गेला असता त्याला मंदगती हा बलाढ्य हत्ती दिसला आणि हा आपल्या हत्तीच्या कळपात  असावा  म्हणून त्याने मंदगतीला हजारो हत्तीच्या  मदतीने पकडले आणि मगध देशात घेऊन आला , पुढे हा बलाढ्य हत्तीला मगध राजा जरासंध ने कंस ह्याला आपल्या मुलींच्या लग्नात हुंड्यात प्रदान केला .

 

कंस ला हि हा मदमस्त , बलिष्ठ , बलाढ्य हत्ती खूप आवडला , कंस ने ह्या हत्तीचे नाव कुवलयापीड़ असं ठेवले आणि त्याला विशेष प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली , बलराम आणि कृष्ण ह्यांना मारण्याचे विशेष प्रशिक्षण त्याला  देण्यात आले   .

मथुरे मध्ये जेव्हा अक्रूर बलराम आणि कृष्णाला घेऊन आले तेव्हा नगर , रंगशाळा बघायला हि दोघे निघाले असता रंगशाळेत आले , तेव्हा दरवाज्यातच कुवलयापीड त्याच्या माहूत बरोबर उभा होता . कृष्णा ने माहुताला त्यांचा रास्ता सोडणायचा आग्रह केला पण माहुताने कुवलयापीडला अंकुश चा जोरदार मारा केला आणि श्री कृष्णच्या पुढे जायला भाग पडले , त्या मारा ला चिडून कुवलयापीड ने कृष्णाला आपल्या सोंडेत पकडला आणि आपटू लागला , श्री कृष्णाने स्वःताला त्याच्या तावडीतून सोडून त्याच्या पायाखाली लपले , ते दिसत नाही म्हणून तो बलिष्ठ हत्ती आजून चिडला , त्याने वासाने कृष्णाला सापडवल आणि  सोंडेने बाहेर काढले , पण परत श्री कृष्ण त्याच्या तावडीतून सुटले त्यांनी त्याची शेपूट पकडून जस ते वृंदावनात गायीनशी खेळत तसे खेळू लागले . कुवलयापीड ह्या मुळे आजून चिडला आणि श्री कृष्णावर जोरात धावून गेला , श्री कृष्ण ने त्याची सोंड पकडून त्याला खाली पडले आणि त्याचे दोन्ही दात उपटले आणि कुवलयापीड चा वध केला त्याचा उद्धार केला.


मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

चिऊचं पिल्लू


 

इवलंसं चिऊ च  घरटं 

त्यात इवलेसे तिचे  पिल्लू 


इवल्या इवल्या पिल्लू चे इवले इवले आभाळ 

इवल्याश्या पंखांना उडण्याची  घाईच  फार 


इवलीशी ती धडपड पंखांची  फडफड 

इवल्या इवल्या जीवाची उडण्याची तडफड 


आभाळात उडायचे उंच उंच लांब 

कधी ह्या झाडावर तर कधी त्या डोंगराच्या  पार 

घटकेत खाली जमिनीवर तर घटकेत वर आकाशात 

पिल्लाची तर आहेत स्वप्न अशी महान 


इवलुश्या पिल्लू ची  इवलुशीच झेप 

ठाऊक आहे चिऊला , लवकरच भरारी घेईल हे थेट  


गौरी